असुरक्षित वीज खांबांमुळे शेतकरी व गावकऱ्यांची चिंता; महावितरण अनभिज्ञ ?
By | अरविंद जाधव
सातारा : पाटण तालुक्यात नदीकाठावर सुरू असलेल्या माती उत्खननामुळे शेती व घरांना वीजपुरवठा करणारे अनेक विजेचे खांब धोकादायक स्थितीत आले आहेत. उत्खनन करताना काही ठिकाणी खांबांच्या सभोवतालची माती पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून ते अक्षरशः कोरीव पद्धतीने उभे असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पूरस्थिती किंवा अतिवृष्टीच्या काळात हे खांब कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून यामुळे महावितरणसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार पाटण तालुक्यातील नदीकाठच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन सुरू आहे. या उत्खननादरम्यान अनेक ठिकाणी शेतीपंप आणि घरांना वीजपुरवठा करणाऱ्या खांबांच्या सभोवतालची माती काढून टाकण्यात आली आहे. परिणामी काही खांब हवेत उभे असल्यासारखे दिसत असून ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.
या उत्खननस्थळी अशा प्रकारे शेकडो विजेचे खांब क्षतिग्रस्त अवस्थेत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. मात्र या प्रकाराबाबत महावितरणला माहिती आहे का, तसेच संबंधित व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात आली आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. माती उत्खननासाठी परवाने देताना महसूल, सिंचन तसेच इतर संबंधित विभागांकडून ‘ना-हरकत दाखले’ घेणे आवश्यक असते. मात्र या प्रकरणात महावितरणची संमती किंवा माहिती घेण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर तसे झाले नसेल, तर हा प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.





























